
- उत्पन्न शून्य, खर्च मात्र वर्षाला १० कोटी
- ठामपाच्या दुर्लक्ष आणि कंत्राटदाराच्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या पैशांची लुट – आमदार संजय केळकर

- पी.वी.आनंदपद्मनाभन
ठाणे:
सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला एक रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला दहा कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

ठाणे पूर्वेत कन्हैय्या नगरलगत ठाणे महापालिकेने पीपीपी तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून २०२१ साली संबंधित कंत्राटदार ए.के. इलेक्ट्रिकल्स या कंपनीने प्रकल्पाचे काम सुरू केले. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणे अपेक्षित असताना त्यासाठी २०२५ साल उजाडले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून १२० एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त पाच एमएलडी शुद्ध पाणी तयार करण्यात आले आहे. सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि तयार होणारे शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावे, असा उद्देश हा प्रकल्प उभारण्यामागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झाली नाहीच, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेलाच दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक दहा कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.

या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.
याबाबत बोलताना केळकर म्हणाले, या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने ९० कोटींचा दंडही ठोठावला आहे तर घेतलेल्या कर्जावर नऊ कोटी एवढे व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. १२० एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त पाच एमएलडी पाणी शुद्ध होत असल्याने कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय निर्माण होत आहे. शिवाय प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ जवळच्या नाल्यात आणि कांदळवनात टाकला जात आहे. परिणामी ठाणेकरवाडी आदी परीसरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत असते तर कांदळवनही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली.

या प्रकल्पातून तयार होणारे शुद्ध पाणी बांधकामे, उद्याने, एमआयडीसी, कारखाने आदींना पुरवून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अपेक्षित आहे, मात्र या उद्देशाला हरताळ फासण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संशयास्पद कंत्राटदार कंपनीला एक दोन नव्हे तर आठ प्रकल्पांची कामे देण्यात आली आहेत.

त्यामुळे या भ्रष्टाचारात अनेक हात गुंतले असल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी आम्ही चौकीदार असून यापुढेही चौकीदाराची भूमिका बजावत राहू, असे स्पष्ट केले

