


पी.वी.आनंदपद्मनाभन
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून, शिवजयंती दिनी संपन्न होणा-या कार्यक्रमांमुळे मुलांना, विद्यार्थ्यांना आपली तत्वे, मुल्ये आणि गौरवशाली वारशाची ओळख होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आज केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून, आज किल्ले दुर्गाडी समोरील नॅशनल ऊर्दु हायस्कुल पासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यासमयी बोलताना महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त वंदना गुळवे, स्वाती देशपांडे, अतुल पाटील, संजय जाधव, अवधुत तावडे, रमेश मिसाळ, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ.नरेशचंद्र, स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ.प्रशांत पाटील, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, योगेंद्र राठोड, शैलेश कुळकर्णी, मनोज सांगळे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपा शुक्ला, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
आजच्या शिवजयंती दिनाचा प्रारंभ शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी व कर्मचारी RSP शिक्षक अधिकारी ,स्काऊट गाईड विद्यार्थी,NCC, NSS विद्यार्थी यांच्या भव्य रॅलीने झाला. सकाळच्या शितल वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांच्या वेशभुषेत तसेच पारंपारिक पोषाखात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बालचमुने, सर्व पांथस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. सदर रॅलीची सांगता लाल चौकी – सहजानंद चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. यावेळी मा.आमदार सुलभाताई गायकवाड आणि महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तद्नंतर प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासमयी मा.आमदार सुलभाताई गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव व इतर मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना न्याय मिळून दिला, त्यांना माझा मानाचा मुजरा आहे” असे सांगत मा.आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विद्यार्थी वर्गास शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
दुगाडी खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले नौदल आरमाराची स्थापना केली होती. ही आठवण जतन करण्यासाठी महापालिकेमार्फत सदर ठिकाणी नौदल संग्रालय उभारण्यात येत असून, सदर संग्रालय नागरिकांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव व प्रशांत पाटील यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. यानंतर महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
https://www.instagram.com/reel/DFHv4rcoAbG/?igsh=MWtrM3JxNjJ6N2U5dw==







