हिरक महोत्सवी वर्धापन दिना सोहळ्यानिमित्त शिवसेनेचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन

पी.वी.आनंदपद्मनाभन
मुंबई,

रक्ताचं नातं सांगून, सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही. शिवसैनिकच खरे वारस आहेत, असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. गोरेगाव नेस्को येथील सभागृहात आयोजित शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काल परवापासून काही कुत्री भुंकत आहेत, पण कुत्री झुंडीमध्ये येतात तर वाघ एकटा येतो. कुत्रे भुंकतात तर वाघ शिकार करतो. ही शिवसेना आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात उबाठा गटाचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाहीत, तर ते तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, शिवसेना म्हणजे विचारांचा आणि तुमच्या आमच्या काळजाचा तुकडा आहे. शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला, अशी टीका शिंदे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, खूर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. हिंदुत्व सोडले. बाळासाहेबांना हयातीत त्रास दिला, त्यांना छळलं पण त्यांच्या पश्चातही बाळासाहेब ज्यांचा तिरस्कार करत होते, त्यांचा तुम्ही पुरस्कार करताय, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादीने फोडली, दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली. त्यांच्यासाठी ओव्या गाताय आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले, काँग्रेसकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष सोडवण्याचे काम केले, त्यांना तुम्ही शिव्या देताय, हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

सलग १२ वर्ष भारताचे नेतृत्व करणारे आणि बाळासाहेबांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात भारताने प्रगती केली. जगभरात भारताचा डंका वाजतोय, सर्व क्षेत्रात भारत अग्रेसर आहे, असे ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली. राहुल गांधी हे भस्मासूर असून ते ज्यांच्यासोबत जातात त्यांना संपवतात, असे शिंदे म्हणाले.
चार वर्षापूर्वी शिवसेनेत केलेला उठाव सुपरहीट झाला. महाराष्ट्राच्या जनतेने तो स्वीकारला. जनतेच्या न्यायालयात आपण जिंकलो. लाडक्या बहिणींचे आणि लाडक्या भावांचे तसेच बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशिर्वाद पाठीशी होते. कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या बळावर आपण ६० आमदार निवडून आणले. आज राज्यात शिवसेनेचे ६० नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत महापौर, सभापती आहेत, नगरसेवक आहेत. सगळीकडे शिवसेनेचे भगवं वादळ आहे. चांदा ते बांदा भगवा करण्याचे काम महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी केलं. त्यांचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संघटन कौशल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले. शिवसेनेत पद हे कामाने मिळते. इथं एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत महायुती सर्वच्या सर्व १७ जागा जिंकेल, विरोधकांची पाटी कोरी राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती अभेद्य आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला ताळमेळ आहे. आपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही चांगला समन्वय आहे, मात्र काही लोक त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ते होणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेनेत मोठी वेटिंग लिस्ट आहे, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक प्रवेश करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात सुरु आहे. मागील चार वर्षात महायुतीच्या काळात महाराष्ट्राचा चौफेर विकास झालाय. आता पुढे एकच लक्ष्य एकच ठाव, शहर ते गाव फक्त शिवसेनेचेच नाव अशी साद उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *