

पी.वी.आनंदपद्मनाभन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली तर नातेवाईकांना रु.पाच लाख अर्थसहाय्याची घोषणा
कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून ६ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसिलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार, ही घटना दि. २० मे २०२५ रोजी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाने तात्काळ मदत व बचाव कार्य सुरू केले.
त्याचबरोबर घटनेनंतर प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
घटनास्थळावरील शोध कार्य पूर्ण झाले असून इमारतीतील नागरिकांना जवळील ज्ञानमंदिर विद्यालय, कल्याण (पूर्व) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्या सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृत सहा नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्री .फडणवीस यांनी केली आहे.